पण त्या मुली समुद्रावर गेल्याच कशासाठी?;गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा अजब सवाल

Update: 2021-07-29 11:48 GMT

पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेनॉलिम (Benolim) बिचवर फिरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना गोव्यात समोर आली आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीका होत असून, विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बलात्कार झालेल्या मुली रात्रीच्या वेळी बीचवर का गेल्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बेनॉलिम (Benolim) बिचवर फिरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी आपण पोलीस असल्याचं सांगत मारहाण करीत बलात्कार केला. तसेच मुलींसोबत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सुद्धा जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद गोव्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहे. विरोधकांनी गोव्याचे समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी सुरक्षित राहिले नसल्याची म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

असं असताना, "अल्पवयीन मुली रात्रभर घराबाहेर का होत्या, त्या समुद्रकिनाऱ्यावर काय करत होत्या, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी म्हटलं आहे. या मुलींच्या आईवडिलांनी आपल्या मुलींना रात्रभर समुद्रकिनारी राहण्याची परवानगी कशी दिली, मुलं ऐकत नाहीत, हे कारण सांगत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या विधानाने विरोधक आणखीच आक्रमक झाले आहे.

Tags:    

Similar News