केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला: सुप्रिया सुळे

Update: 2021-09-24 13:29 GMT

देशात अचानक सोयाबीनचे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावरूनच आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुध्दा होत आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे ( supriya sule ) यांनी सोयाबीन दर कमी झाल्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर केंद्र सरकारने केलेल्या आयातीमुळे सोयाबीन शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन ( soyabean ) हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे पीक ठरत आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येण्याची आशा दिसत होती. नेमकं याच काळात केंद्र सरकारने सोयाबीन आयात केले परिणामी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचे दर कोसळले,असल्याचं सुळे म्हणाल्या.

तर, सोयाबीनच्या आयातीला महाराष्ट्र सरकारने विरोध दर्शविला होता,हे प्रकर्षाने नमूद करीत आहे. केंद्र सरकारने केलेल्या आयातीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.चांगल्या उत्पन्नाची आस असणारा शेतकरी यामुळे हताश झाला. PMO India आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाचं काय झालं हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे,असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला.

तसेच, शेतकरी व ग्राहक यांचे हित जोपासताना कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सोयाबीन बाहेरुन मागविताना घेण्यात आली नाही.याचा शेतकऱ्यांना तीव्र फटका बसला आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, सोयाबीनच्या दरात झालेल्या पडझडीमुळे शेतकरी संतापलेला आहे. त्याला याचं उत्तर मिळणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन या प्रकरणात सुनियोजित पद्धतीने दर पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

Tags:    

Similar News