'जय श्री राम' म्हणजे केवळ राजकारण - ॲड. यशोमती ठाकूर

Update: 2022-09-06 12:32 GMT

'जय श्री राम' म्हणणे म्हणजे केवळ राजकारण असून आपण राम राम बोलले पाहिजे. अगदी देशाचे खुद्द पंतप्रधान मोदी समोर आले तरी 'राम राम' च म्हणणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज अमरावतीत एका कार्यक्रमात केले. अमरावती येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अमरावती येथे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन आज ॲड. यशोमती ठाकूर यांच्या आई श्रीमती पुष्पमाला भैय्यासाहेब ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी येथील उपस्थित स्वामी भक्तांशी ॲड. यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की रामाच्या नावाने खूप राजकारण होतं, पण आपल्या घरात असलेले राम मंदिर 400 वर्षे जूनं आहे. आपण कधीच रामाच्या नावाने राजकारण केले नाही आणि करणार नाही. कारण ती भक्ती आहे, राम राम म्हणणं ही आपुलकी आहे, जय श्री राम म्हटलं की ते राजकारण असतं. स्वत:च्या अंतर्मनात जी शक्ती आहे ती शक्ती जागृत करून आपल्या मनातील भिती घालविण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. मग आपण कोणत्याही धर्माचे असाल, मग राम असू शकेल, अल्लाह असू शकेल, त्या त्या देवाचे नाव आपण घेऊ शकाल. अगदी आपण स्वत:च्या नावाचा जप करा किंवा स्वत:च्या अंतर्मनाला जे वाटते तेच करा. अंतकरणामध्ये विश्वास ठेवा की आपण काही चुकीचे करत नाही. मात्र जर कधी काळी काही झालंतर देव आपल्या पाठीशी आहे हा आपला विश्वास आणि अनुभव असल्याचे माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. अमरावती येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ ट्रस्टच्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Tags:    

Similar News