Corona Package: महिलांनो तुमच्यासाठी खुशखबर...

Update: 2020-03-26 10:23 GMT

कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाल्याने अखेर केंद्र सरकारनं सुमारे १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजची गुरूवारी घोषणा केली आहे. ही घोषणा प्रामुख्याने गरीब आणि -शेतकरी वर्गासाठी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २१ Days Lock Down जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या वर्गासाठी उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

गरीबांसाठीच्या अन्न योजनेतून देण्यात येणारं धान्य आता दुप्पट करण्यात आले आहे. गरिबांना पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ आणि १ किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. तर पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर, आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

तर तुमारे साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला हे पैसे त्यांच्या खात्यात येतील.

उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढील तीन महिने मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गरीब, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दोन टप्प्यात १००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला जनधन योजनेअंतर्गत पुढील तीन महिने दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येणार आहेत. महिला बचतगटांच्या कर्ज मर्यादेमध्येही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान सरकारनं मध्यमवर्गाला अजून तरी कोणताही दिलासा दिलेला नाही. होमलोन, इतर कर्जांचे हप्ते, क्रेडीट कार्डचे बिल कसे भरायचे असा प्रश्न अनेकांसमोर आहे. बँकांनी हप्तेवसुली सध्या स्थगित करावी असे निर्देश सरकारने द्यावे अशीही मागणी याआधी करण्यात आली आहे. पण सरकारनं त्यावर अजून कोणताही निर्णय़ घेतलेला नाही.

Similar News