नकुशी.... नको असलेल्या मुली! #Repost

बीड जिल्ह्यात झालेल्या बेकायदेशीर गर्भपातामध्ये महिलेचाही मृत्यू झाला होता. पण या महिलेला आधीच तीन मुली देखील होत्या. मग प्रश्न हाच उपस्थित राहतो की मुलाचा जन्म होईपर्यंत मुली जन्माला घातल्यामुळे मुलींचा जन्मदर वाढला आहे का? याचा आढावा घेणारा मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांचा ह रिपोर्ट वाचायलाच हवा...

Update: 2022-06-11 08:07 GMT

 महाराष्ट्रात अशा नको असलेल्या मुलींना सर्रास नकुशी नाव ठेवण्यात येतं. अशा नकुशी देशभरातही आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात ०-२५ वयोगटातल्या जवळपास दोन कोटी दहा लाख मुली नकुशी आहेत.

मुलींचा जन्मदर वाढला म्हणून सगळीकडे मोठ मोठी भाषणं केली जातात, मात्र सत्य परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मुलगा होईपर्यंत मुली होऊ देण्याचं प्रमाण जास्त असल्याने मुलींची संख्या वाढताना दिसत आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र असं असलं तरीही मुलींच्या जन्माचं स्वागत करायला अजूनही अनेक जण तयार नाहीत.

भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाप्रमाणे भारतातील पालक अजूनही मुलगा जन्माला यावा अशीच आशा बाळगतात. जास्तीत जास्त मुलं जन्माला यावीत अशीच त्यांची इच्छा असते. साधारणत: भारतीय कुटुंबात दोन मुलं असण्याला पसंती दिली जाते, मात्र अनेक परिवारांमध्ये मुलगा होईपर्यंत न थांबण्याचा ट्रेंड ही आहे,

नैसर्गिकत: १०५० पुरूषांच्या मागे १००० स्त्रिया असा जन्मदर असतो. १९९४ मध्ये लिंगनिदान चाचण्यांवर बंदी घातल्यानंतर भारतातील जन्मदर स्थिरावायला लागला.

जन्मदराच्या अभ्यासात एका गोष्टीवर फारसा विचार झाला नव्हता तो म्हणजे शेवटचं मूल मुलगा आहे की मुलगी. अनेक कुटुंब मुलगा होईपर्यंत मुलं जन्माला घालतात. संपत्तीची वाटणी, हुंडा पद्धती, लग्नानंतर मुली सासरी जातात त्यामुळे सांभाळ करायला कुणीतरी हवं ही भावना आणि वंशाचा दिवा अशा विविध कारणांनी मुलांचा हव्यास भारतीय कुटुंबाना असतो. त्याचमुळे इतर देशांच्या तुलनेत २०१५–१६ मध्ये मुलींचा जन्मदर ९.५ टक्क्यांनी कमी होता.

ज्या परिवारात एक मूल आहे तिथे लिंगगुणोत्तर १.८२ म्हणजे १००० स्त्रियांमागे १८२० होतं. दोन मुलं असणाऱ्या परिवारात हे खाली जाऊन १.५५ तर तीन मुलं असणाऱ्यांमध्ये थोडं वर जाऊन १.६५ तर चार मुलं असणाऱ्यामध्ये १.५१ आणि पाच मुलं असणाऱ्यांमध्ये १.४५ इतकं होतं.

शेवटचं मूल मुलगा नाहीये अशा परिवारांसोबत जर तुलनात्मक अभ्यास केला तर हेच लिंग गुणोत्तर आपल्याला अनुक्रमे १.०७, ०.८६, ०.८५, ०.८४ आणि ०.८८ इतकं आढळतं. याचाच अर्थ पहिलं मूल जर मुलगा असेल तर दुसरं मूल जन्माला घालण्याचं प्रमाण कमी आहे.

मुली जन्माला येतात त्या मुलगा पाहिजे या हव्यासा पोटी अशा स्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत कसे होईल.

Tags:    

Similar News