ज्या ट्रेनसाठी मजूर ट्रॅकवर चालत होते, त्याच ट्रेनने मृतदेह घरी पोहचवले

Update: 2020-05-09 06:17 GMT

औरंगाबाद जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. (Aurangabad Train Accident) ल़ॉकडाऊनमुळे मध्य प्रदेशातील आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या या मजुरांना विशेष ट्रेन गाठायची होती. पण दुर्दैव म्हणजे या मजुरांना त्याआधीच मृत्यूनं गाठल्याने त्यांचे मृतदेह विशेष रेल्वेनं त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहेत.

हे ही वाचा...

या घटनेतील ५ जखमींवर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता हे सर्व मजूर जालन्याहून औरंगाबादला पायी निघाले होते. पण नंतर रस्त्याने जाण्याऐवजी त्या सर्वांनी रेल्वे ट्रॅकवरुन जाण्याचा निर्णय घेतला. पण ३६ किलोमीटर पायी चालल्यानंतर थकल्याने या सर्वांनी ट्रॅकवरच आराम करण्याचा निर्णय़ घेतला. पण त्याचवेळी त्यांना झोप लागली आणि मालगाडीखाली ते सर्व चिरडले गेले.

Courtesy : Social Media

लॉकडाऊनमुळे अकडलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण या मजुरांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचून त्यांच्यासाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती देण्यात अयशस्वी ठरल्याचंच या दुर्घटनेवरुन दिसून आले आहे.

Similar News