बैलांच्या मानेवरचे ओझे तरुणांनी केले हलके..

Update: 2022-07-17 05:01 GMT

 महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने आहेत. या कारखान्याजवळ असलेल्या ऊस क्षेत्रातून साधारण ३०० बैलगाड्यांद्वारे उसवाहतुक केली जाते. यामध्ये शेतातून ऊस भरत असताना बैलागाडी उभी करण्यासाठी लावलेल्या लाकडी दांड्या मोडणे, बैलांवर अतिभार येणे, रस्त्यांवर पाय घसरणे यामुळे बैलांना दुखापत होते. यामध्ये बैलांचे पाय देखील मोडतात. बर्याचदा चालकानादेखील दुखापत होते. बैल निकामी झाल्याने आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. या समस्यांवर आर आय टी इस्लामपूरच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले आहे. ज्यामुळे बैलांचा भार कमी होतो.बैलगाडी संतुलित राहते.

हा रोलिंग सपोर्ट कमी जास्त वर खाली करता येतो. या प्रकल्पाचे येत्या गळीत हंगामात अंमलबजावणी देखील केली जाणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान सौरभ भोसले, निखील तीपायाले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. त्यांना या प्रकल्पाकरिता शिवाजी विद्यापीठातून निधी उपलब्ध करण्यात आला होता. या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्ट चे पेटेंट मिळविण्यासाठी अर्ज देखील करण्यात आला आहे. प्रोजेक्टसाठी डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी अभिनंदन केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. आर डी. सावंत व गव्हर्निंग कौंसिल चे चेअरमन मा. भगतसिंह पाटील यांनी या टीमचे कौतुक केले.


Full View

Tags:    

Similar News