15 जुलैपासून ग्रामीण भागात शाळा सुरु, मात्र ही राहणार 'अट'... 

Update: 2021-07-07 11:58 GMT

मुंबई: राज्यातील शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात जा गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत. त्यामुळे, ज्या गावांत मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल तसेच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमताने केला असेल, अशा गावांत इ. ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल.

मात्र, शाळा सुरु करण्यापूर्वी राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यास ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती जबाबदार असेल. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेतील,
असेही वर्षा गायकवाड म्हणाल्यात.

Tags:    

Similar News