हुंडा न दिल्यानं नवरदेव रुसला, मग काय....

Update: 2021-09-22 07:48 GMT

भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात हुंड्यासाठी लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे. रीतीरिवाजाप्रमाणे लग्न जुळले, घरात लग्नाची तयारी सुरू झाली. साखरपुड्याचाही कार्यक्रम आटोपला. पत्रिकाही छापल्या, हॉलचे बुकिंगही करण्यात आले. मात्र, लग्नाचा दिवस जवळ आला. वर पक्षाकडून हुंड्यासाठी निरोप आला. वेळेवर मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचा निरोप वधूपित्याने धाडला. हुंडा नाही तर लग्न नाही असे म्हणत नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही.

राजेंद्र वामनराव शिंदे, रा. केळकरवाडी, जि. वर्धा असे हुंड्यासाठी रुसलेल्या नवरदेवाचे नाव असुन लाखनी येथील दिव्या (काल्पनिक नाव ) या मुलीचा विवाह राजेंद्र शिंदे याच्या सोबत ठरला होता. लग्नाची तयारी सुरू झाली. 15 ऑगस्ट ला साखरपूड्याचा कार्यक्रमही झाला. 16 सप्टेंबर ला लग्नाचा मुहूर्त ठरला असताना नवरदेवांनी वधूच्या वडिलांना दोन तोळ्याचा सोन्याचा गोफ आणि वऱ्हाडी साठी बसची मागणी केली. ऐन वेळेवर कसे शक्य असे म्हणत वधू पित्यानी मागणी फेटाळली मग काय, नवरदेव रुसला व मंडपात पोहोचलाच नाही.

नवरीच्या भावाने या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले

लग्नाची संपूर्ण तयारी झाली आचारी, डेकोरेशन, हॉल, मेहंदी वाले, सगळे बुक झाले. मात्र, वेळेवर नवरदेव रुसल्याने वधू पक्षाकडील मंडळींना मोठा धक्काच बसला. अखेर वधूच्या पित्याने लाखनी पोलीस स्टेशन मध्ये नवरदेवाविरुद्ध तक्रार दिली आहे. यांच्या परिवारावर कडक कार्रवाई करण्याची मागणी केली आहे. लाखनी पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत नवरदेवाविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम 1961 कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिस निरिक्षक मनोज वाढवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दिनांक 16 सप्टेंबर ला यांचा विवाह होता. परंतू आरोपीने लग्नाच्या काही दिवस अगोदरच सोन्याचा गोफ द्या. आणि येण्या जाण्य़ाचा खर्च मागितला. वधू पक्षाने ही मागणी फेटाळल्याने नवरदेव नियोजीत लग्नाच्या दिवशी आला नाही. वधू पक्षाच्या फिर्यादीवरून हुंडाबंदी अधिनियम 1961 कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरिक्षक गाढवे यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News