सुषमा स्वराज यांचा काँग्रेसवर हल्ला

Update: 2019-05-16 03:56 GMT

वारणसीतल्या महिला संमेलनात बोलताना केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेसच्या महिला धोरणावर कडाडून हल्ला चढवला आहे. मोदी सरकारने स्वातंत्र्यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे सहा महिलांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलंय, तर त्यातील दोघींना मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत ही स्थान दिलंय.

मोदींचा महिमा सांगतानाच सुषमा स्वराज यांनी नेहरूंपासून मंत्रिमंडळातल्या महिला प्रतिनिधीत्वाची आकडेवारीच जारी केली आहे.

१९५२-१९५७ या काळात जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळात अमृत कौर या केवळ एकच महिला मंत्री होत्या. १९५७ ते १९६२ या त्यांच्या दुसऱ्या सरकार मध्ये एकही महिला मंत्री नव्हती. १९६२-६४ या त्यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये डॉ. सुशीला नय्यर या एकच महिला मंत्री होत्या. त्यानंतर लाल बहादुर शास्त्री यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात (१९६४-६६) सुशीला नय्यर यांचं स्थान तसंच ठेवलं.

इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये ( १९६६-६७ ) सुशीला नय्यर मंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्या १९६७-७१, १९७१-१९७७ आणि १९८०-१९८४ या सरकारांमध्ये एकही महिला कॅबिनेट मध्ये नव्हती, त्यानंतरच्या राजीव गांधी सरकारमध्ये ( १९८४-८९ ) मध्ये मोहसिना किडवई या एकच महिला मंत्री होत्या.

अशी माहिती जारी करून सुषमा स्वराज यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Similar News