पंकजा मुंडेंच्या एल्गाराला यश.. ऊसतोड कामगारांची घरवापसी होणार

Update: 2020-04-18 04:52 GMT

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून राज्यातील ऊसतोड कामगारांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साखर कारखानदारांनी कामगारांना घरी पोहचवण्याची व्यवस्था करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन (Lock Down) लागू झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी सातत्याने ही समस्या लावून घरली होती अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे.

ऊसतोड कामगारांना (Sugarcane Worker) त्यांच्या घरी सोडण्यासाठी संबंधित कारखाना प्रशासनाने संबंधित जिल्हाधिकारी, त्या त्या गटाचे मुकादम व मजुरांच्या संबंधित गावचे सरपंच यांच्याशी समन्वय साधून मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जनावरांसहित सुखरूप त्यांच्या गावी पोहोचविणण्याचा बंदोबस्त करावा, असे या आदेशात म्हटले आहे.

परतीच्या प्रवासासाठी मुकादमाच्या मदतीने गावनिहाय गट तयार करावेत, त्यांच्या गाव परतीचा इव्हाक्युएशन प्लॅन तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठवावा जेणेकरून ऊसतोड मजूर जिथे जाणार आहेत, त्या त्या गावांमध्ये पुढील व्यवस्था सोपी जाईल, असंही आदेशात म्हटलं आहे.

गेल्या गुरुवारी पंकजा मुंडे य़ांनी ऊसतोड कामगारांच्या पाठीशी उभं राहताना सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. “ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत एकही साधा शिंकला नाही, मग काय चिंता आहे. त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य?? आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.” अशी भावना व्यक्त करत मला उद्याच निर्णय हवा आहे अन्यथा मी तिथे जाणार अशी भुमिका घेतली होती.

यानंतर शुक्रवारी राज्य सरकारने हा आदेश जारी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार मानले आहेत. तसेच ऊसतोड कामगारांना आपल्या स्वगृही परतताना शिस्तीचे पालन करुन व्यवस्थित घरी पोहचण्याचे आवाहन केले आहे.

Similar News