'या' कारणामुळे स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Update: 2020-03-05 05:26 GMT

केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा (CAA), एनआरसी (NRC) आणि एनपीआर (NPR) विरोधात बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अनेक व्यासपीठांवरुन आपला विरोध व्यक्त करत असते. स्वराच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. मात्र यावेळी सरकारविरोधी वक्तव्यांमुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

कानपूरमधील सीएमएम-७ कोर्टात स्वरा भास्कर हिच्या विरोधात कानपूरचे वरिष्ठ अधिवक्ता विजय बक्शी यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अंतर्गत स्वरा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

“आपल्या चिथावणीखोर भाषणांमुळे स्वरा भास्कर भारत सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भडकाऊ भाषण करत आहे. या कारणांमुळे दोन समाजात वाद उद्भवत आहे. या संदर्भात मी देखील स्वरा भास्करचा एक व्हिडीओ पाहिला होता, ज्यामुळे दिल्लीत दंगलीची परिस्थिती उद्भवली. हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आईबीचे अंकित शर्मा यांची या दंगलीत हत्या करण्यात आली होती. या सर्व कारणांमुळे मी ही याचिका दाखल केली.” असं विजय बक्शी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील बक्शी यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 20 मार्च ही तारीख दिली आहे. त्यांनतर स्वरा भास्कर हिच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भात स्पष्टता मिळेल.

Similar News