आजवर अनेक लग्न तुम्ही पाहिलीत... लग्न म्हटलं की आहेर, भेटवस्तू देणं-घेणं आलंच. आहेराला कपडेचं हवे असा अट्टाहास अनेकांचा असतो त्यात विशेषतः महिला मंडळींचा वेगळाच थाट असतो. मात्र आता नव्या काळानुसार अनेक लग्नात कपड्यांच्या आहेर ऐवजी समाजात जनजागृती होईल अशी काळजी घेतली जातेय. कधी झाड, संविधान देऊन विचारांचा आहेर दिला जातो तर कधी महिलांच्या आरोग्याची काळजी घेत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केलं जात. असं आगळं-वेगळं लग्न झालं ते अहमदनगरमध्ये.
पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा विवाह झाला.या वेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आली. लग्नात आशीर्वादाची भाषणाऐवजी मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी? ही भाषणे होती.
नवरा मुलगा भारत हा युवा चेतना फाउंडेशन संघटनेचा सदस्य असून ह्या संघटनेतील युवकांनी आजवर अशाच आगळ्या-वेगळ्या प्रथा लग्नात रुढ केल्या आहेत. एका लग्नात पुस्तकांचा रुखवत होता. एका लग्नात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. एका लग्नात वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. तसेच हा प्रोजेक्टच्या माध्यमातून येत्या काळात युवाचेतना फाऊंडेशन एक लाख महिलांपर्यंत पोहचनार असुन हा प्रकल्प शाश्वत करणार आहे असे युवाचेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष अमर कळमकर यांनी सांगितले. या उपक्रमामुळे महिलांचे मासिक पाळीबाबत प्रबोधन झालं असून समाजात जगजागृती होत आहे.