आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरचे सर्व आरोप खोटे

Update: 2019-04-20 08:19 GMT

2019च्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण सध्या एका वेगळ्याच रंगात रंगलंय. ते म्हणजे जातीय रंग, हिंदु आंतकवाद इ. नुकतचं भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लोकसभेचं तिकिट दिलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली साध्वी प्रज्ञाने हेमंत करकरेंच्या नेतृत्वातील एटीएसने माझा आतोनात छळ केला असा आरोप शुक्रवारी केला होता. तसंच माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मारले गेले असं वादग्रस्त वक्तव्यही तिने केलं होतं. यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.

साध्वी प्रज्ञाच्या आरोपात किती तथ्य?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा २००८ ते २०१७ असे ९ वर्षं तुरुंगात होती. तुरुंगात असताना अनेकदा माझा एटीएसने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञाने केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मानवी हक्क आयोगाने एका समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आर.एस खैरे यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने २०१४-२०१५ मध्ये याप्रकरणी कसून चौकशी केली होती. प्रज्ञाचे आरोप सिद्ध होऊ शकतील असे कोणतेही साक्षी-पुरावे उपलब्ध नसल्याचं या समितीने आपल्या अहवालात २०१५मध्ये स्पष्ट केलं होतं.

या समितीने याबाबत अहवाल सादर करण्याच्या चार वर्षं अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञाचे आरोप फेटाळले होते. न्या. जे .एम पांचाल, न्या. एच एल गोखले यांच्या खंडपीठाने मानवी हक्क आयोगाला याप्रकरणाची चौकशी करण्याचा सल्ला दिला होता. पण २००८मध्ये दोन रुग्णालयांत साध्वी प्रज्ञाची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा डॉक्टरांना तिच्या शरीरावर कोणतीच जखम का सापडली नव्हती? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच २००८ मध्ये २४ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबरला तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा याप्रकरणी प्रज्ञाने कोणतीच वाच्यता केली नव्हती याची नोंदही सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

एकंदरित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यावर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झाल्याचे पुरावे मिळाले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला भुरळ पाडण्यासाठी तुरुंगांत आपल्यावर झालेल्या खोट्या अत्याचाराची दवंडी साध्वी पिटत आहे.

Similar News