#meetoo मोहीमेपासून ग्रामीण भागातील महिला वंचित का ?

Update: 2019-06-14 06:24 GMT

#meetoo चं वादळ... तनुश्री लैंगिक शोषण प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली. मात्र मीटूचं वादळ शमलं असं म्हणता येणार नाही. शहरीभाग जर सोडला तर ग्रामीण भागातील महिला या चळवळीपासून वंचित का? या विषयावर प्रियंका आव्हाड यांचा हा लेख

सध्या #meetoo चं वादळ पुन्हा एकदा जोर धरू लागलं आहे. सोशल मीडियावर असलेल्या महिला- मुली आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या कहाण्या मांडू लागल्यात… हळूहळू ही मोहीम चांगलीच जोर धरू लागली असताना आपण कधी विचार केला का ज्या महिलांना आपल्यावर झालेल्या अत्याचारांची वाच्यता करण्यासाठी व्यासपीठच नाही अशा महिलांनी काय करावं… या #meetoo चळवळीत आपण फक्त शहरी भागातील महिलांचा विचार केला कारण त्या सोशल मीडियावर असल्यामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करता आल्या आणि अत्याचार झाल्याची वाचा फोडता आली. परंतु या सगळ्यात ज्या महिला मोबाईल, स्मार्ट फोन वापरत नाही अशा ग्रामीण भागातील महिलांच काय…? त्यांच्यावरही अन्याय, लैंगिक अत्याचार होत असतो परंतु सोशल मीडियावर नसल्यामुळे त्यांना या चळवळीत सहभाग घेता येत नाही. अशा महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता कुठे आणि कशी करावी.

सोशल मीडियावर सुरु असलेली चळवळ ही फक्त त्यावर सक्रीय असलेल्या हाय क्लास महिला किंवा हॉलिवूड, बॉलिवूडच्या महिलांपूरतीच मर्यादित आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. ग्रामीण भागातील महिलांनाही लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. कधी ते घरातील व्यक्ती असो,शेजारी किंवा जवळचा मित्रांतूनकडून होणारा लैंगिक छळ… शहरीभागात हे प्रकार घडतात तसे ग्रामीण भागातही मोठ्याप्रमाणात हे प्रकार सुरु आहेत. परंतु या #Meetooo चळवळीबद्दल ग्रामीण भागातील महिलेला काही माहितीच नाही आणि जरी माहिती असली तरी त्यात सहभागी कसं व्हावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. जरी आज डिजिटल महाराष्ट्रच्या घोषणा होत असल्या तरी ग्रामीण भागातील महिला या पासून कोसोदूर आहेत. त्यांना सोशल मीडिया, इंटरनेट याची माहिती नसल्यामुळे तर कधी इंटरनेट मुळे तर कधी घराची इज्जत वाचवण्यासाठी मूक गिळून बसावं लागतं.

#meetoo चे वादळ सुरु असताना त्यात प्रकर्षाने शहरी भागच दिसला जातो. कुठेही ग्रामीण भागातील महिला यात सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या नाही. एखादचं असं प्रकरण समोर येत परंतु ते या चळवळीतून नाही. ग्रामीण भागातील महिलांनाही अशा लैंगिक अत्याचाराला सामोर जावं लागतं मात्र त्या महिला-मुली अत्याचार होऊनही शांत का?

काय कारणे असू शकतात ग्रामीण भागातील महिला #meetoo चळवळीत सहभागी नाही?

- ग्रामीण भागातील महिला इंटरनेटपासून वंचित

- सोशल मीडियाची माहिती नाही.

- स्मार्ट फोन वापरत नाही

- महिला असल्यामुळे घराच्या इज्जतीचा प्रश्न

- घरातूनही महिलांना मोबाईल वापरण्यास बंदी

- कधी-कधी मोबाईल वापरत असूनही ग्रामीण भागातील महिला-मुली कुणाच्यातरी दबावाखाली असणं… इत्यादी अशी ही अनेक कारणं असू शकतात जी ग्रामीण भागातील महिलांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता करु देत नाही. परंतु या महिला अन्यायविरोधातील चळवळीत ज्याप्रकारे शहरी भागातील महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची वाचा फोडली तशी जागरूकता ग्रामीण भागात कधी येणार. ग्रामीण भागातील महिलेला आपल्यावर अत्याचार झाल्याची वाच्यता कधी आणि कुठे करता येईल. जर हा लेख तुम्ही वाचत असाल तर गप्प बसू नका आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवा.

प्रियंका आव्हाड

Similar News