अमृता फडणवीसांना आवरा, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचे करियर खराब होईल, किशोर तिवारींचं आरएसएस ला पत्र

Update: 2020-02-27 17:08 GMT

अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं RSS ला पत्र

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अमृता फडणवीसांना आवरा, असं म्हणत अलिकडे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरण्याची मागणी केली आहे. मध्यंतरी भैय्याजी जोशी यांनी फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस या जर असेच संबंध वाईट करत राहिल्या तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील, असा सवाल तिवारी यांनी आपल्या पत्रातून उपस्थित केला आहे.

मध्यंतरी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा उल्लेख अमृता फडणवीस यांनी रेशीम किडा असा केला होता. त्यावरुन आता राजकारण पेटताना पाहायला मिळत आहे.

काय म्हटलंय तिवारी यांनी...

“बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्यासारखे अनेक नेते राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या पत्नी देखील सामाजिक कामात सहभागी होतात. मात्र, त्यांनी नवऱ्यासाठी अशा राजकीय विषयांवर टीका केली नाही. अशी कोणतीही संस्कृती नाही.”

असं म्हणत

“जर तुम्हाला हिंदुत्ववादी पक्षांशी प्रेम टिकवून ठेवायचं असेल, तर या लोकांना आवरा, अशी मी मागणी केली आहे. निवडणुकीनंतर रात्रीचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा तोल गेला आहे. फडणवीस आता प्रत्येकवेळी घसरून बोलत आहेत. मात्र, अशावेळी देवेंद्र फडणवीसांना वाचवण्यासाठी भाजपमधील कोणीही येताना दिसत नाही. अचानकपणे त्यांच्या पत्नी ट्विटरवरुन काहीतरी लिहितात आणि वाद निर्माण करतात.”

त्यांची विधानं राजकीय समीकरणांमध्ये विष कालवणारी आहेत. त्यांची लिहिण्याची भाषा देखील चुकीची आहे. कुणाला किडा वगैरे म्हणणं हे वेदनादायक असतं. हे शब्द परत घेतले जात नाहीत. इतका अहंकार नसायला हवा. असं म्हणत अमृता फडणवीस यांना आवरा अशा आषयाचं पत्र किशोर तिवारी यांनी आरएसएसला लिहिलं आहे.

Similar News