भारतीयांना उपहास समजत नाही?

Update: 2019-06-02 09:34 GMT

'भारतीय नोटांवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढून टाका' अशी मागणी केल्यानं आयएएस अधिकारी निधी चौधरी या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. राजकीय स्तरावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. मात्र, आता निधी यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटवर सारवासारव केलीय. त्यातून एक नवा अँगल समोर आलाय.

विषय चिघळल्यानंतर निधी यांनी ते वादग्रस्त ट्विट काढून टाकलंय. निधी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी इंग्रजी साहित्यात विद्यापीठात पहिल्या क्रमांक पटकावलाय आणि आपल्या गोल्ड मेडलची त्या वाट पहातायत. त्यांनी जे काही लिहीलं होतं उपहासात्मक होतं, आणि लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असं त्यांनी म्हटलंय.

एका इंग्रजी साहित्यातल्या गोल्ड मेडलिस्टच्या म्हणण्याचा असा अर्थ निघत असेल तर विद्यापीठात इंग्रजीचा अभ्यास करण्यापेक्षा पासबुक वाचायला हवं होतं अशी उद्विग्न प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. स्वप्नातही गांधींजींचा अनादर करण्याचा विचार आपल्या मनात येणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याविषयी आदरच असेन असं ट्विट निधी यांनी केलंय.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134822429480476674

विषय चिघळल्यानंतर निधी यांनी आता आपण कसे गांधी विचारांचे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. गांधीजींवरचे आपले जूने ट्विट्स, गांधी पुतळ्यांसोबतचे फोटोज त्यांनी पुन्हा शेअर केलेत. 'मी जीवनात कठीण परिस्थितीतही डगमगत नाही कारण माझे मूल्य गांधीजींच्या विचारधारेतून येतात', असं निधी यांनी म्हटलंय.

गांधी-नेहरु-पटेल आणि इतर सर्वच महामानवांच्याबद्दल राजकीय दृष्टीकोनातूनही कायम चर्चा होत असतात. राजकीय पक्षांनीही आपापले महात्मे वाटून घेतलेत. ही विचारधारेची लढाई आहे असं म्हणत त्याला आणखीन बळकट केलं जातंय. त्यामुळं सगळा विषयच संवेदनशील बनलाय. त्यात सोशल मीडीयानं समाजाच्या भावना अधिकच कमकुवत केल्यात. त्यात एक आएएस दर्जाचा अधिकारी जेव्हा अशी काही भूमिका मांडतो तेव्हा अर्थात सर्वांच्या भूवया उंचावणं सहाजिकच आहे.

ट्विटरवरही दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक अजूनही निधी यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी करतायत तर काहींनी निधी यांना पाठिंबा दर्शवलाय.

निधी यांच्या मते अनेक वर्षांपासून त्यांच्या व्हॉटसअपचं स्टेटस 'सत्यमेव जयते' हे आहे. त्यामुळे सत्याचाच विजय होईल असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134898027582316544

Similar News