महिलांच्या ताटातून पालेभाज्या गायब

Update: 2019-04-09 06:25 GMT

पानात काही टाकशील तर याद राख, काहीच खायला देणार नाही, जेवायला टंगळमंगळ करणाऱ्या लहान मुलांना हा दम आपण नेहमीच देतो. कारण मुलांच्या पोटात संतुलित आहार गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण झालंय असं की मुलांनी सकस खावं असा आग्रह धरणाऱ्या महिलाच सकस खात नाहीत, असं दिसून आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त नुकत्याच करण्यात आलेल्या आय ब्लूमबर्गच्या सर्व्हेनुसार भारतातील ३७ टक्के महिला फक्त आठवड्यातून एकदाच पालेभाजी खातात.

पालक, मेथी, चवळी, कोथिंबीर, आंबटचुका, शापू, राजगिरा, तांदुळजा, चाकवत, अळू, अंबाडी, कडीपत्ता या भाज्या जीवनसत्त्व मिळवण्यासाठी चांगल्या आहेत. पण त्यांचे सेवन कमी होत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः महिलांनी आहारातून पालेभाजी कमी केलेय. जिथे रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या असायला हव्यात, तिथे आठवड्यातून एकदाही जेवणात पालेभाजी नाही, अशी स्थिती अनेक महिलांच्या बाबत दिसून येते.

याबाबत कांदिवलीच्या गृहिणी शर्वरी पारकर म्हणतात, आमच्या घरी पालेभाजी म्हणजे जोड भाजी समजली जाते. नुसत्या पालेभाजीवर घरातील मंडळी जेवत नाहीत, दुसरी त्यांच्या आवडीची भाजी बनवावी लागते. त्यामुळे घरात पालेभाजी शिजवण्याचे प्रमाण कमी आहे. घरात डायबेटीसच्या पेशंट साठी मेथीची भाजी मात्र वरचेवर करतो.

आहारतज्ञ स्वप्नाली पालकर सांगतात, पालेभाज्यांमध्ये लोहचे प्रमाण जास्त आहे. तसेच फायबरचे प्रमाण जास्त आहे. मात्र त्या खायच्या कशा हे आपल्याकडे समजत नाही. या भाज्या पौष्टिक म्हणून खाल्ल्या जातात, पण त्यात जीवनसत्त्वे मिसळली पाहिजेत. म्हणजे त्यात व्हिटामिन 'सी'साठी लिंबू पिळला पाहिजे किंवा टॉमेटो टाकले पाहिजे. लो कॅलरी साठी पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत.

 

Similar News