दत्तक मुलं घेणं… त्यांचा सांभाळ करणं… मग ते बाळ मोठे झाल्यावर खऱ्या आई-वडिलांबद्दल त्याला सांगणं… हे बोलणं खूप सोप्पं आहे मात्र प्रत्यक्षात खूप कठीण आहे. दत्तक मुलांना आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची खरी माहिती देणं किती गरजेचं आणि त्याचा काय परिणाम होईल याविषयी स्वतंत्र पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गायत्री पाठक यांनी आपलं मतं मांडलं आहे.
दत्तक अपत्याला बायोलॉजीकल मुलं बोरिंग वाटणं हे डेंजर आहे आणि दत्तक अपत्याला आपल्या पाल्याचा सहज स्वीकार असताना त्याला त्याच्या जन्मदात्या छाननी करण्याचा अधिकार आहे हे सुद्धा सांगणे जरा अतीच नाही का? अपत्यालाच वाटत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण असं काही वाटत नसताना उगाच मोठेपणाचा आव आणणे हे त्या परिपक्व नात्यासाठी घातकच आहे. कुतूहल म्हणून आपले पालक कोण आहेत हे समजून घेणं वेगळं; आणि खरंतर ते तेव्हढ्या पुरतंच मर्यादित असावं. पण तसं ते मर्यादित राहत नाही. बरं जन्मदाते कळल्यावर दत्तक अपत्याच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. झालाच तर क्षणिक आनंद, भूतकाळाचा मनस्ताप, स्वतःला कोसणे यापलीकडे काहीही होत नाही. जन्मदात्याना खूप वर्षांनी भेटल्यावर त्यांच्या विषयी प्रेम, ममत्व, काळजी वाटेलच हे सुद्धा व्यक्ती व्यक्ती अवलंबून आहे. जन्माला घालणारे पालक हौसेने अनाथालयात सोडत नसले तरी त्यांनी पालकत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी समाजातील उपलब्ध पर्यायांचाही विचार केला नाही हेही उघड सत्य आपल्याला नाकारून नाही चालणार. शिवाय दत्तक गेलेली सगळीच मुलं काही कुमारीमातेची त्यागपत्राने सोडलेली नसतात. काही पालक सरळ सरळ पालकत्वाची जबाबदारी पेलत नाहीत म्हणून अनाथालयाच्या दाराशी आणून ठेवतात. पालकत्वाचा बेजबाबदारपणा यावर तर भारत जगात पहिल्या नंबरवर आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर आज भारतात 31 मिलियन अनाथ, निराश्रित बालकं या अशाच बेजबाबदारपणाची झलक आहे. अशा बेजबाबदार पालकांची भेट पुण्यातील काही संस्था फॉरेन रिटर्न दत्तक अपत्याला करून देतात. बरं फॉरेन रिटर्न, श्रीमंत दत्तक मुलांनाच दत्तक अपत्याला जन्मदाते शोधण्याचा अधिकार आहे असंही चित्र या संस्थांमधून दिसून येतं. यामागची संस्था आणि ते पाल्य यांची 'गणितं'ही वेगळी असतात. मागची 10 वर्षांची अशाच शोधून काढलेल्या दत्तक अपत्यांचा इतिहास पहात होते. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं.
दत्तक मुलांनी आपले जन्मदाते शोधावेत का नाही, हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. समजाच त्या 'शोधण्याने' हे दत्तक अपत्य बिथरले तर जन्मदात्यांची, कष्टाने सांभाळलेल्या, प्रेमाने वाढवलेल्या दत्तक पालकांच्या अस्वस्थतेची, दत्तक पाल्याला इमोशनल ब्लॅकमेलची पुढील जबाबदारी संस्था किंवा संबंधित सामाजिक कार्यकर्ते घेणार आहे का?