Home > Political > "यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का.." जितेंद्र आव्हाड भावुक..

"यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का.." जितेंद्र आव्हाड भावुक..

यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का.. जितेंद्र आव्हाड भावुक..
X

सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. या सगळ्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहीत सर्वांचे आभार मानले आहेत.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत पहा..

माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करीत असतांना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव श्री. संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्री. श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव श्री. मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव श्री. डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी श्री. म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी श्री. सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी श्री. डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी ह्या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.

मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो.

परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिका-यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणा-या प्रत्येकाची नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले.

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहका-याबद्दल आपले आभार मानतो.

आणि हो आणि कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे

आपला

-डॉ. जितेंद्र आव्हाड

Updated : 30 Jun 2022 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top