Home > Political > ठाकरेंच्या आशीर्वादानेच आमदार जाधवांचा उद्दामपणा मोकाट सुटला: विजया रहाटकर

ठाकरेंच्या आशीर्वादानेच आमदार जाधवांचा उद्दामपणा मोकाट सुटला: विजया रहाटकर

ठाकरेंच्या आशीर्वादानेच आमदार जाधवांचा उद्दामपणा मोकाट सुटला: विजया रहाटकर
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असून , याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. भास्कर जाधव यांच्या दमदाटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि विशेष करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव व महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांनी 'ठाकरेंच्या आशीर्वादानेच आमदार जाधवांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे, असा आरोप केला आहे.

माध्यमांना माहिती देतांना विजया रहाटकर म्हणाल्यात की, संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी. तसेच सत्तेचा माज दाखवून सामान्य जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजया रहाटकर यांनी केली.

भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये, असाच त्यांच्या उद्दाम वागण्याचा इशारा होता, हे त्या प्रसंगाच्या व्हीडियोमधून राज्यभरातील जनतेस कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांदेखत असा उद्दामपणा करूनही त्यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थन केले असून, संकटग्रस्तांबाबत सरकार संवेदनशून असल्याचेच दाखवून दिले असल्याचा आरोप रहाटकर यांनी केला

तर, संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या संकटग्रस्तांना तातडीची मदत देणे दूरच, मदतीची घोषणादेखील न करता हात हलवत परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बेजबाबदारपणाचे जाहीर दर्शन घडविले आहे. तुमच्यावर कोसळलेल्या दुःखातून तुम्हीच स्वतःस सावरा, असा त्रयस्थ सल्ला देऊन संकटग्रस्तांच्या वेदनांवर मीठ चोळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्यासारख्या उद्दाम आमदाराचा जनतेच्या अपमानासाठी वापर करून घेतल्याने, मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे रहाटकर म्हणाल्या. भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Updated : 26 July 2021 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top