Home > पर्सनॅलिटी > रुग्णालयात फेऱ्या मारायच्या वयात या सरपंच बाई गावासाठी मारतायत न्यायालयाच्या फेऱ्या

रुग्णालयात फेऱ्या मारायच्या वयात या सरपंच बाई गावासाठी मारतायत न्यायालयाच्या फेऱ्या

या सरपंच बाईंनी रुग्णालसाठी न्यायालयिन लढा दिला. मग अधिकाऱ्यांनी जागेचा प्रश्न उपस्थित केला. पण त्यांनी विचार करत न बसता स्वत:ची केबीन आरोग्य केंद्रासाठी दिली. आज ज्या ठिकाणी सरपंच बसत होते त्या ठिकाणी डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत.

रुग्णालयात फेऱ्या मारायच्या वयात या सरपंच बाई गावासाठी मारतायत न्यायालयाच्या फेऱ्या
X

सरपंच बाईच्या डोयीवर शेणाची पाटी खुर्चीवर बसून पती करतो वाटाघाटी.. जवळपास महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये बहुतांश हीच स्थिती आहे. "त्यांना त्यातलं एवढं कळत न्हाय, सगळं मीच बगतो" अशाच आविर्भावात अनेक सरपंचांचे कारभारी बोलत असतात. राष्ट्रीय सणाला झेंड्याची दोरी हातात पकडणाऱ्या महिला सरपंचांचा कारभार मात्र दुसरेच चालवत असतात.

आळसंद या गावाच्या सरपंच इंदुमती जाधव मात्र याला अपवाद ठरलेल्या आहेत. त्यांनी खुर्चीवर बसून केवळ गावाचा कारभारच हाकला नाही तर परिसराच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रसंगी कोर्टात मंत्रालयात हेलपाटे घालत गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र खेचून आणले आहे.

वयोवृद्ध महिला ज्या वयात दवाखान्यात येरझाऱ्या घालत असतात त्या वयात गावात प्राथमिक आरोग्य केंद्र यावे यासाठी उच्च न्यायालय तसेच मंत्रालयात खेटे घालणाऱ्या सरपंच इंदुमती जाधव या मॅक्स वूमन ठरल्या आहेत.

त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गावात यावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डोक्यावर पदर घेतलेल्या इंदुमती जाधव मुंबईच्या गर्दीतून वाट काढत न्यायालयात हजर राहत होत्या. यासंदर्भात शासन अध्यादेश निघावा म्हणून मंत्रालयाची पायरी झिजवत होत्या. त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा नितीनराजे जाधव यांनी त्यांना प्रेरणा दिली आहे. हे करत असताना त्यांनी कुठेही त्यांच्या कामात दखल घेतली नाही.

सुरवातीला काम करत असताना त्यांना अडचण येत होती. पण कोणती फाईल कशाप्रकारची आहे. ग्रामपंचायतीचे काम कशा प्रकारे चालते याचे प्रशिक्षण त्यांच्या मुलाने त्यांना दिले. आणि हळूहळू त्या काम शिकल्या.

गावात प्राथमिक आरोग्य केंद्र येण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्या सांगतात कुठ अपघात झाला तर विटा येथे जाईपर्यंत अनेक रुग्णाचा जीव जात होता यासाठी गावात किमान प्राथमिक उपचार मिळायला हवेत यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी मी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा विजय झाला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. तसा अध्यादेश निघाला पण तरीही राजकीय उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाई या मध्ये या आरोग्य केंद्राचे काम रखडले.

यानंतर त्यांनी परिसरातील महिला सरपंचांना घेऊन आंदोलनाची तयारी केली. पुन्हा अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. या नंतर प्रशासन हलले. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरीत करू पण यासाठी तात्पुरत्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. पण स्वतःच्या खूर्चीपेक्षा केबिन पेक्षा गावांसाठी आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे म्हणत स्वतः बसत असलेली सरपंचांची केबिन त्यांनी आरोग्य विभागाला दिली.

आज ज्या ठिकाणी सरपंच बसत होते त्या ठिकाणी डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. परीसरातील नागरीकांची अल्प दरात आरोग्याची सोय झाली आहे.

चूल आणि मूल या दोन गोष्टीमध्ये बंदिस्त असलेल्या या सरपंच बाईंनी मुंबईपर्यंत जात आपल्या गावात दवाखाना खेचून आणला आहे.

Updated : 25 Dec 2020 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top