Home > News > "पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प" चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

"पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प" चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
X

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल महाविकास आघाडी सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर "पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प" असं म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पातून मुलींसाठी, शेतकरी महिलांसाठी, बचत गटाच्या माध्यमातून महिला रोजगार निर्मितीसाठी त्याचबरोबर लघुउद्योग आणि अंगणवाडी सेविकांच्या तोंडाला पानं पुसली आल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

कोरोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्याच्या हेतूने हा अर्थसंकल्प कृषी, आरोग्य व मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री च्या आधारे मांडला असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पंचसूत्रीचा माध्यमातून एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असं म्हटलं. सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाची वाहवा होत असली तरीही विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'कळसूत्री सरकारचा पंचसूत्री अर्थसंकल्प' असे म्हणून टीका केली आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या अर्थसंकल्पाला पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प असे म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून महिला अधिक सक्षम होण्यासाठी कोणतीही ठोस योजना या अर्थसंकल्पात नसल्याचं म्हंटल आहे.

चित्रा वाघ यांनी काय म्हंटल आहे पाहुयात..

हा तर पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प…

महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या 12 कोटी 50 लाख यात महिला 6 कोटी 1 लाख तरीही सर्व क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतात तर प्रोजेक्शन का नाही? स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींसाठी विशेष तरतूद हवी होती..लायब्ररी etc महिला अधिक सक्षम होण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. महिला शेतकरींसाठी काहीच तरतूद नाही. बचतगट माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती प्रोत्साहनासाठी काही तरतूद नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे महिला…लघु उद्योगात महिलांच्या तोंडाला पानं पुसली, अंगणवाडी सेविकांसाठी तरतूद ही धूळफेक तर आशांना कोविडकाळात दिवसाला ३५/-रू देण्याचे शासनाने आश्वासन देऊनही अद्याप पैसे दिले नाहीत थोडी लाज सरकारला शिल्लक असेल तर तात्काळ राज्यभरातील आशांचे पैसे देऊन टाका. असं म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

हे देखील वाचा..

अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या तरतुदी..

• सन 2022 वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषी योजनांमध्ये राखीव असलेल्या निधीमध्ये तीस टक्के रक्कम वाढवून यापुढेही 50 टक्के करण्यात येणार आहे.

• सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार आहे.

• हिंगोली , यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या ठिकाणी प्रत्येकी शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येतील.

• कौशल्यात वाढ करून रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

• गडचिरोली जिल्ह्यात खासगी सहभागातून कौशल्य वर्धन केंद्र उभारणी करून दरवर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल यासाठी शासनाकडून 30 कोटी रुपयांची तरतूद व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

• महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय

• त्यासाठी मुंबई विद्यापीठातील जागा निश्चित करून शंभर कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.

• मुंबई येथील एलफिस्टन आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकरीत प्रत्येकी पाच कोटी रुपयांची तरतूद..

• तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल व व्याज सवलतीची स्वयंरोजगार योजना राबविण्यात येणार आहेत.

• राज्यातील सर्व तृतीयपंथीयांना ओळखपत्रे आणि शिधापत्रिका देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे

• एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e - शक्ती योजनेतून 1 लाख 30 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

• 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्थांना किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 11 हजार 25 रुपायांवरून 2 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

• जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

• त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे.

• नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

• सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

• विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी वर्षानिमित्त 'मी रमाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना' जाहीर करण्यात आली आहे.

• कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत भांडवलाच्या कर्जावरील व्याजाचे शंभर टक्के परतफेड करण्यात येईल.

• सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.

• राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या फुले दाम्पत्य निवास्थान फुले वाडा या स्मारकाच्या विस्तारासाठी शंभर कोटी रुपयांचा निधीची तरतूद

• महाराणी सईबाई यांच्या स्मृती परिसरासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Updated : 12 March 2022 6:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top