दिव्यांगाना घरी जाऊन लस द्या; औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश
X
कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अनेक उपक्रम सुद्धा राबवले जात आहे. मात्र असे असतांना लसीकरणाच्या मोहिमेत दिव्यांगाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे आता दिव्यांगाना घरी जाऊन लस देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
याप्रकरणी दिव्यांग सचिन चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याच याचिकेवर सुनावणी झाली असता, दिव्यांगाना घरी जाऊन लस देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे दिव्यांगाना घरी लस मिळण्याचा मार्ग झाला मोकळा झाला आहे. तर दिव्यांगांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने लवकर घ्यावा असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला असून, लसीकरणासाठी त्यांना होणारा त्रास आता कमी होणार आहे. अनेक दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचणे शक्य नव्हते तर काहींना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता त्यांना घरबसल्या लस मिळणार असल्याने, दिव्यांगांनी न्यायालयाचे आभार मानले आहे.