Home > News > विवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त

विवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त

विवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त
X

विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते, अशा वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन राज्याच्या साबयर विभागाने केले आहे.

सध्याच्या काळात बऱ्याच लग्न जमवणाऱ्या संस्थांनी आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत. ज्यावर ते तरुण आणि तरुणींची त्यांच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती ,परिवाराची माहिती व फोटो अपलोड करत आहेत. अशा वेबसाईटवरील माहिती सायबर भामट्यांमार्फत ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळ्या बाजारात विकण्यासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. यात फसवणूक झालेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे.

कशी होते फसवणूक?

१) जेव्हा असे प्रोफाईल बनवले जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल मॅच झाल्याचे नोटिफिकेशन येते. यात बऱ्याचदा मॅच झालेला प्रोफाईल कोणत्या तरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाचा असतो . (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते. त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईलचा आधार घेतात) हळूहळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने त्यांना मोहित करते .ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केला तरच कॅमेरावर व्हिडिओ कॉल होतो. मग एके दिवशी ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहे. नंतर फोन येतो की, तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व कस्टम क्लिअरन्सकरिता अडकले आहे. त्यामुळे एका ठराविक अकाउंटमध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी मग २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हाला मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले तरी पार्सल येत नाही. तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक डिअक्टिवेट (deactivate) होते .

२) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण सुरु होते. संभाषणात एकमेकांबद्दल जवळीक निर्माण होऊन अनेक वैयक्तिक व खाजगी फोटोज व माहिती शेअर केली जाते. हळूहळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला ब्लॅकमेल (blackmail) करण्यास सुरुवात करते. ठराविक रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे फोटोज व माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली जाईल.

३) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूने संभाषण सुरु होते, पण या प्रकारात मुख्यतः फसवली जाणारी व्यक्ती एकतर घटस्फोटित किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत किंवा ज्यांची लग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात. त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.

काय सावधगिरी बाळगाल?

प्रोफाईल बनवताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका. तसेच फक्त एखाद दुसरा फोटोच अपलोड करा. प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका. घरातील कोणत्या तरी वयाने मोठ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक द्या. तसेच परदेशातील भारतीय प्रोफाईलने मॅच केले म्हणून हुरळून जाऊ नका, उलट अशा स्थळाची अजून सखोल चौकशी करा . कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी समोरची व्यक्ती खरी आहे याची तुम्हाला खात्री झाली तरीदेखील आपली सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी फोटोज शेअर करू नका . तसेच जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा . ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास इच्छुक आहेत त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे .सायबर भामटे अशाच व्यक्तींना विशेषतः महिलांना आपले लक्ष्य करत असतात .

महाराष्ट्र सायबर या सर्व मॅट्रिमोनियल वेबसाईट व ज्या विवाह संस्था ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना देखील विनंती करते कि सावध राहा. आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या विवाहइच्छुक व्यक्तीस नोंदणी करताना आपले ओळखपत्रपण अपलोड करायला सांगा. विशेषतः परदेशातील भारतीय नागरिक जर नोंदणी करत असतील तर त्यांच्याकडून ओळखपत्र म्हणून त्यांच्या पासपोर्टची प्रत देणे हे अनिवार्य करा. तसेच त्यांना भारतामध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकाचा पत्ता व ओळखपत्र देणे बंधनकारक करा. तुमची वेबसाईट ही सुरक्षित आहे याची वेळोवेळी खात्री करून घ्या, कारण तुमच्या वेबसाईटचा वापर करून उद्या कोणत्याही व्यक्तीची आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली तर माहिती तंत्रज्ञान कायदा २०००,कलम ७९(३)(ब) अंतर्गत तुम्हाला पण जबाबदार धरले जाऊ शकते व तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल?

तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा.

Updated : 21 July 2020 3:36 AM GMT
Next Story
Share it
Top