Home > News > कोल्हापूर नंतर वाशिम जिल्ह्यातील गावाने घेतला विधवा प्रथा बंदीचा निर्णय…

कोल्हापूर नंतर वाशिम जिल्ह्यातील गावाने घेतला विधवा प्रथा बंदीचा निर्णय…

कोल्हापूर नंतर वाशिम जिल्ह्यातील गावाने घेतला विधवा प्रथा बंदीचा निर्णय…
X

मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला होता. हेरवाड ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक निर्णयाचं हे लोण आता राज्यभर पसरू लागलंय. वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतनेही असाच ठराव घेऊन विधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला आहे. असा ऐतिहासिक निर्णय घेणारी विदर्भातील ही पहिली ग्राम पंचायत ठरली आहे.

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि पायातील जोडवे काढणे इत्यादी प्रथा प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत. विधवा महिलांना कोणतेही धार्मिक किंवा मंगल कार्यात उत्साहपूर्वक सहभागी होण्यासाठी समाज मान्यता देत नाही. त्यांना सन्मान न देता समाजात दुय्यम वागणूक मिळते. कुटुंबात फारशी विचारपूस होत नाही. त्यांचे विचार आणि सल्ला ऐकला जात नाही. असे प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच पहायला मिळतात. विधवा महिलांना कमी दर्जाची वागणूक देणे. तिरस्काराने पाहणे अशा वर्तणुकीमुळे विधवा झालेल्या सर्व गटातील महिलांना सन्मानाने जगता येत नाही.

महिला आणि पुरुषांना कायद्याने सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असताना या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते. त्यामुळे अशा महिलांना मान सन्मान मिळावा या उद्देशाने गावाच्या सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांच्या पुढाकाराने ढोरखेडा ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी गावातील महिलांनी एकत्र येत मोठी ग्रामसभा आयोजित होती. त्यात सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचं आता सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे.

Updated : 16 May 2022 4:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top