Home > News > पायाला भिंगरी आणि हातात कामाचे कंकण घेऊन धावणाऱ्या लोकनेत्या आमदार यशोमतीताई ठाकुर

पायाला भिंगरी आणि हातात कामाचे कंकण घेऊन धावणाऱ्या लोकनेत्या आमदार यशोमतीताई ठाकुर

पायाला भिंगरी आणि हातात कामाचे कंकण घेऊन धावणाऱ्या लोकनेत्या आमदार यशोमतीताई ठाकुर
X

विधानसभेच्या २००४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिवसा विधानसभा मतदारसंघातून ऍड.यशोमती ठाकुर यांचा प्रा. साहेबराव तट्टे यांच्याकडून पराभव झाला होता. यशोमती ठाकूर यांची ही पहिलीच निवडणुक होती. तुलनेने त्या राजकारणात नवख्याही होत्या. वडिलांचा राजकीय वारसा असल्याने राजकारण त्यांनी अगदी जवळुन बघितले होते. तरी देखील त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळात म्हणजे २००९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एक विधानसभा क्षेत्र कमी होऊन नऊ ऐवजी आठच विधानसभा मतदारसंघ झाले. त्यात तिवसा आणि वलगाव यांचे विभाजन होऊन वलगाव मधील काही भाग बडनेरा तर उर्वरित तिवसा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.

त्यावेळी वलगाव मतदारसंघाचे आमदार स्व. संजय बंड होते, वलगाव मतदारसंघ कमी झाल्याने त्यांनी आपली २००९ ची विधानसभा निवडणूक तिवसा मतदारसंघातुन लढवण्याचा निर्णय घेतला. स्व.संजय बंड हे जनसामान्यांचे नेते होते, त्यांना पराभुत करणे सोपे नव्हते. मात्र, हे आव्हान ऍड. यशोमतीताई ठाकुर यांनी स्वीकारले आणि यावेळी त्या निवडुन आल्या. खरं तर हे अविश्वसनीय होतं. मात्र, या ताईंनी ते सत्यात उतरवलं.





अमरावती जिल्ह्याची राजकारणातील ओळख म्हणजे ताईंचा जिल्हा अशी आहे. याची सुरुवात मातोश्री विमलाबाई देशमुख यांच्या पासुन झाली. भारतरत्न, शिक्षणमहर्षी, भूमिपुत्र भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या दुःखद निधनानंतर विमलाबाई देशमुख खासदार झाल्या होत्या. त्यानंतर उषाताई चौधरी दोनवेळा खासदार राहल्या. आता सौ. नवनीत कौर राणा अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहे. याच परंपरेत माजी राज्यमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख, विद्यमान आमदार सौ. सुलभाताई खोडके राज्यस्तरावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आणि आपल्या पक्षाचं राज्यपातळीवर महिला प्रदेशअध्यक्ष पद ज्यांनी भूषवले त्या किरणताई महल्ले (भाजप), सौ.सुरेखाताई ठाकरे(रॉ. काँग्रेस) यावर कळस म्हणजे ज्यांनी या देशाच सर्वोच्च राष्ट्रपतीपद भूषविल त्या माजी आमदार, खासदार, मंत्री आणि राज्याच्या विरोधी पक्षनेत्या महामहिम प्रतिभाताई पाटील. यावरून आपल्या जिल्ह्याला महिला प्रतिनिधीचा समृध्द वारसा लाभला आहे. तोच वारसा आपल्या कर्तृत्वातून पुढे नेत आहे त्या म्हणजे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ऍड.यशोमती ठाकूर.





यशोगामीनी #यशोमती #ठाकूर यांची यशोगाथा

कर्तृत्वाला पुरुष-स्त्री अशा मर्यादा असु शकत नाहीत. आणि हेच नेतृत्व इतिहास घडवू शकते. नामदार यशोमती ठाकूर अशाच व्यक्तीमत्वाच्या धनी आहेत.

संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या १४ वर्षांपासून त्या प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी केलेली विकास कामे थक्क करणारी आहेत. पहिल्यांदा २००९ मध्ये आमदार म्हणुन त्या निवडून आल्या त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या पाच वर्षांत ग्रामीण भागातील रस्ते, विविध तीर्थस्थळांचा कायापालट झाला. त्यांचा मतदारसंघातील असलेला अहोरात्र दांडगा जनसंपर्क पाहता दिवस त्यांचा मावळत नाही, असंच म्हणाव लागेल.

आक्रमक नेतृत्व असलेल्या यशोमती यांनी कायम घेतलेली रोखठोक भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली. मतदारसंघातील जनते सोबत त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व त्यांच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा ठाम विश्वास हीच त्यांची बलस्थाने आहेत. सिंचनाचा प्रश्न, महिला बचत गटांना व्याजमुक्त कर्ज पुरवठा, अप्पर वर्धा धरणातुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी केलेला निर्णायक संघर्ष, रु .२७८ कोटीची महत्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजना, रु १५० कोटीचा मोझरी गुरुकुंज विकास आराखडा, रु. ४० कोटीचा वलगांव येथील कर्मयोगी संत गाडगेबाबा निर्वाणभुमी विकास आराखडा, रु. ४० कोटीचा श्रीक्षेत्र कौंडण्यपुर विकास आराखडा तिवसा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व ट्रामा केअर युनिट तसेच तिवसा येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल ही विकास कामे ठळकपणे नजरेत भरतात.





विधीमंडळ अधिवेशनातही यशोमती ठाकूर यांनी अव्वल रहात काम केले. १४ वर्षांच्या कार्यकाळात २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी केलेली विकास कामे तेव्हापासून जशी थक्क करणारी आहेत ती आज सुद्धा आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही एकमेव विधानसभेत महिला आमदार म्हणुन सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम त्यांनी विदर्भ क्षेत्रातुन केला. त्यांनी विधानसभा अधिवेशनात वर्ष २००९ ते २०२३ या काळात एकूण ५३५ च्या वर प्रश्न विचारले होते. यामध्ये शेतकरी, पुनर्वसन शेती विषयक ५० च्यावर प्रश्न उपस्थित केले, पाणी टंचाई, सिंचन सुविधा याबाबत ३४ प्रश्न त्यांनी सभागृहात विचारले.

धोरण विषयक प्रश्न याबाबत सुद्धा ५ वर्षात सरकारच्या विविध धोरणाबाबत ज्या चार आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये आमदार यशोमती यांचा सहभाग होता. सरकारच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी नेहमीच सभागृहात आवाज उठवला त्यामुळे सरकारला त्यांच्या आक्रमतेपुढे नमते घेवुन त्यात बदल करावा लागला. तर त्यांनी अनेक वेळा सरकारला सभागृहात धारेवर धरले.

महिला आमदार असल्या तरी त्या आपल्या कर्तव्यात कुठेच कमी पडल्या नाहीत. ज्या-ज्या वेळी सरकारने चुकीचे निर्णय घेतले त्या-त्या वेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदार म्हणून या धोरणाचा विरोध केला. जर शेतकरी आत्महत्या करतात पण सरकार मात्र याबाबत कोणताच निर्णय घेत नसेल तर हा सरकारचा नैतिक पराभव आहे, असे ठाम मत त्यांनी सभागृहात मांडले. तसेच महिला विषयक धोरणाबाबतही त्या कायमपणे सभागृहात बोलल्या. महिला बचत गटांना ११ लक्ष रुपये व्याज मुक्त कर्ज मिळावे ही प्रमुख मागणी त्यांनी आक्रमकपणे सभागृहात मांडली. देशात सध्या वाढलेल्या ,मॉब लिचिंग'च्या घटना, महिलांचे हक्क, अधिकार, धनगर, कोळी, मुस्लिम व लिंगायत समाजालाही आरक्षण हे मुद्दे त्यांनी पोटतिडकीने मांडले.





महाविकास आघाडी सरकार मध्ये महिला व बालकल्याण मंत्री म्हणून महिलांसाठी विविध धोरणे, अनाथ बालकांसाठी भविष्यकालीन उपाययोजना, अंगणवाडी आणि आशा सेविका यांच्यासाठी त्या भक्कमपणे काम करत उत्तम कार्य त्यांनी केले. हे काम काही विरोधकांपेक्षा पोटात दुखणाऱ्यांच्या टीकेच्या त्या धनी होतात पण या टीका समाजाच्या भल्यासाठी नसतात तर त्या फक्त व्यक्तीगत राजकिय असतात. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जो कार्यकाळ त्यांनी भूषविला त्या काळात ग्रामिण व शहरी विकासाचा सुवर्णमध्य साधत त्यांनी जिल्ह्यात कोट्यवधींची विकासकामे केली, त्यात प्रशासकिय इमारती असो की जनतेच्या मनातील विकास कामे.

यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था यावर बहुतांश संस्थावर जिल्ह्यात व तिवसा मतदारसंघात विजयी पताका फडकविल्या. यशोमतीताई सामान्य कार्यकर्त्यास राजकीय क्षेत्रात युवकांना प्रथम प्राधान्य देतात आणि आज मंत्रीपद भूषवुन सुद्धा त्या जमिनीवर आहेत हे विशेष. त्यांच्या १७ मे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

Updated : 17 May 2023 1:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top