Home > रिपोर्ट > धारावीचा गड राखण्यात वर्षा गायकवाड यांना यश

धारावीचा गड राखण्यात वर्षा गायकवाड यांना यश

धारावीचा गड राखण्यात वर्षा गायकवाड यांना यश
X

स्थानिकांच्या सुखःदुखाशी स्वतःला जोडून घेऊन काम, दांडगा जनसंपर्क आणि विचारांशी बांधिलकी या कारणांनी धारावी विधानसभा मतदासंघ गायकवाड घराण्याशी जोडला गेला आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघाने आपले माप काँग्रेसच्या पदरात टाकून मुंबईतील काँग्रेस जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या मुंबापुरी मतदारसंघाप्रमाणे आपले कार्य निष्ठेने केले. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘धारावी’ मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. १९९९ ला बाबूराव माने यांचा अपवाद सोडला तर हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. यावेळी चौथ्यांदा वर्षा गायकवाड विधानसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या. राहूल गांधी यांच्याबरोबर आदित्य ठाकरे, ओवीसी अशा मातब्बर नेत्यांनी इथल्या प्रचारात उडी घेतल्याने इथल्या निवडणूकिस विशेष महत्व प्राप्त झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेची वाढती लोकप्रियता गायकवाड यांची डोकेदुखी ठरू लागली होती. अशातच राहूल गांधी यांच्या सभेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर वर्षा गायकवाड यांचा आत्मविश्वास वाढला. या निवडणुकीत मिळालेल्या यशाने काँग्रेसकडे गड कायम ठेवण्यात त्यांना यश आले.

मुंबई जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ हा शहरी असला तरी झोपडपट्टी लोकवस्तीमुळे वेगळा मानला जातो. अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय तसेच मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. इथले प्रश्न, समस्या या इतर मतदारसंघापेक्षा वेगळ्या आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा इथला सर्वात मोठा मुद्दा होता. हाच मुद्दा पुढे करत सारे राजकीय पक्ष आपले राजकारण करू पहात होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इथल्या वाऱ्याची दिशा बदलू लागल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार गायकवाड यांनी जोमाने कामास सुरूवात केली. घरोघरी जाऊन सारा मतदारसंघ पिंजून काढत प्रचारास सुरूवात केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या असलेल्या वर्षा गायकवाड या लहानपणापासूनच राजकारण बघत आल्या आहेत. वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या गायकवाड यांनी घाटकोपर इथल्या झुनझुनवाला कॉलेजमधून सायन्स मधून पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातून गणित विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच बीएडही पुर्ण केले आहे. शिक्षण पुर्ण होताच वडिलांचा वारसा पुढे चालवत त्यांनी २००४ ला पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हापासून हा मतदारसंघ सातत्याने काँग्रेसकडे राहिलेला आहे.

काँग्रेसची ढळत चाललेली सत्ता आणि पक्षांतरच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड आणि एकनाथ गायकवाड या दोघांसाठीही ही निवडणुक जिंकणे महत्त्वाचे होते. शिवसेनेनेचे उमेदवार आशिष मोरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे जातीने या मतदारसंघात फिरत होते. शिवसेनेने इथली निवडणुक प्रतिष्ठेची करून ठेवली होती. राहूल गांधीच्या सभेचा करिष्मा यासगळ्यावरचा इलाज ठरला. त्यानंतर रात्रंदिवस एक करत गायकवाड यांनी रॅली, चौक सभा यावर भर देत अथक परिश्रम घेतले. याचा लाभ त्यांना निवडणुकीत नक्कीच झाला. ५३ हजार ९५४ मते मिळवत त्यांनी विजय मिळवला. जवळपास ११ हजारांनी त्यांनी आशिष मोरे यांना पराभूत केले.

अटीतटीच्या निवडणुकीत आमदार वर्षा गायकवाड यांच्या बाजूने जनतेने कौल दिला असला तरी त्यांना आता या मतदारसंघात ठोस असे काम करुन दाखवावे लागणार आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे काम हाती घेऊन इथल्या मुलभूत समस्या सोडवाव्या लागणार आहेत. धारावीतील स्वच्छतेचा प्रश्न, इथला आरोग्याचा प्रश्न याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

https://youtu.be/svlnytW9k8o

Updated : 1 Jan 2020 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top