Home > रिपोर्ट > प्रकाशाची शलाका...!!

प्रकाशाची शलाका...!!

प्रकाशाची शलाका...!!
X

गोष्ट आहे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा गावची. 1300 लोक वस्तीचं गाव आहे.पश्चिम विदर्भातल्या कोरड्या भागात मोडणारं. पाण्याचा दुष्काळ पाचवीला पुजलेला. गाव जरी विदर्भात येत असलं तरी मराठवाड्याच्या जवळ असल्यामुळे बोलणे चालणे आणि पीक पद्दती मध्ये बरचसं साम्य. अठरा विश्व् दारिद्र्य हे कर्माचे भोग आहेत हा समज, जन माणसात दृढ झालेला... गोष्ट यासाठी सांगतोय, क्रांतीचा जन्म कुठे होतो, चार वर्षांपूर्वी संगीता आव्हाळे यांनी गळ्यातलं मंगळसूत्र विकून घरात स्वच्छालय बांधलं होतं. मी या गावात जाऊन त्या महिलेवर विशेष स्टोरी केली होती, त्यावेळी या स्टोरीला खूप व्यापक प्रसिद्धी मिळाली होती. दिल्ली पासून मुंबई पर्यंत गौरव झालेला होता. एखाद्या गावचं पाणी जिद्द देणारं असतं. ही झाली पहिली स्टोरी. मी आता दुसरी स्टोरी सांगतोय ती याच गावातली. माणिकराव आव्हाळे हे कास्तकार म्हणजे शेतकरी, शिक्षण जेमतेम दहावी नंतर 12 वी ला गाडी अडकलेली, जी त्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात अतिशय सामान्य गोष्ट होती, मुलांच्या शिक्षणाचे असे वांदे त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे तर अक्षर ओळख व्हावी म्हणून शाळेत घालण्या एवढे, ‘शिकून लै काय कलेक्टर होणार हायीसं का?’ हा त्या काळातला कॉमन डायलॉग होता. त्यामुळे माणिकराव आव्हाळे यांच्या पत्नी जेमतेम चौथी शिकलेल्या. मुळात माणिकराव हे प्रागतिक विचाराचे त्यामुळे शिक्षण हे बदलाचे मोठे माध्यम आहे याची पुरेपूर जाणीव झाल्यामुळे त्यांची मुलगी मनीषाला लहानपणा पासून चक्क शिकायला पुण्यात ठेवलं. गाव फक्त सुट्टी पुरते मर्यादित असल्यामुळे अभ्यास हाच पूर्ण फोकस राहिला. सिंहगड कॉलेज मधून बारावी केल्यानंतर थेट आय एल एस मधून विधी पदवी घेतली. आय. ए. एस व्हायचं हे बीज अगोदरच मनात पेरलं होतं. आणि वडिलांनी संस्कारिक मशागत करताना याला पोषक असचं होईल हे पाहिलं होतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मर्म समजून घेऊन थेट दिल्ली गाठून " आय ए एस होण्यासाठीचं गुरुकुल वाजीराम गाठलं " या अथक परिश्रमाला पहिल्यांदा यश मिळालं ते आय आर एस च्या रूपात मात्र मनिषा यांचे गंतव्य होते ते आय ए एस त्यांच्या जिद्दीने 2018-19 ला या यशाला गवसणी घातली. गाव खेड्यातल्या माणिकराव आव्हाळेची लेक. सायखेड्याची मुलगी. ज्या गावातल्या महिलेने स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र विकलं त्या गावाच्या या कन्येने देशात 33 व्या रँकनं आणि महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकानं "आय ए एस " मध्ये यश प्राप्त केलं. मेहनतीला फळ आलं आणि महाराष्ट्र केडर मिळालं. पहिलं प्रशिक्षणार्थ पोस्टिंग साताऱ्यात मिळालं. त्या सगळं खूप बारकाईने शिकून घेत आहेत. परवा मला फोन केला आणि तुमचं ऑफिस बघायचं आहे म्हणाल्या खूप आनंद झाला. माझ्या सारख्याच एका खेड्यातली शेतकऱ्याची लेक "आय ए एस " झालेली बघणं म्हणजे खूप भावनिक गोष्ट होती. मुळातच "शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी " या उक्ती प्रमाणे शालीनता, नम्रता हे गुण पदोपदी जाणवणाऱ्या मनिषा आव्हाळे मॅडम आल्या, प्रशासकीय इमारतीतली सर्व कार्यालयं दाखविली. त्यांनी सर्वांची कार्यपद्दती जाणून घेतली. माझ्या कार्यालयात आल्या. माझ्या खुर्चीत बसल्या, मला झर्रर्रकन माझी आई, बहीण आणि अशा शेकडो गाव खेड्यातल्या स्त्रिया दिसल्या. खूप धन्यता वाटली... दोन पिढ्या मागे सरकारी कचेरीत कागद पत्रावर सही मागितलं तर अंगठा पुढे करणाऱ्या पिढीची वारसदार आए. ए. एस होणं माझ्यालेखी खूपच अभिमानाची आणि इथून पुढच्या पिढयांना प्रेरणादेणारी गोष्ट आहे. वाशिम जिल्ह्याची पहिली लेक "आए ए एस " झाली... एकच वाक्य आठवलं... तमसो माँ ज्योतिर्गमय... सावित्रीच्या हजारो, लाखो लेकीच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण होवो, त्या कर्तबगार आणि आत्म सन्मानाचे प्रतीक बनोत... अशी या निमित्ताने एका मुलीचा बाप म्हणून अपेक्षा करतो... !!

युवराज पाटील

Updated : 27 Jun 2020 11:26 AM GMT
Next Story
Share it
Top