Home > Max Woman Blog > स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढणारा पहिला राजा शाहू महाराज

स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढणारा पहिला राजा शाहू महाराज

स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढणारा पहिला राजा शाहू महाराज
X

चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते....

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे.

त्यांनी १९०२ मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गाना ५० % आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकुम केला .राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्त्ये ठरले .

रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती त्यानिमित्त विनम्र अभिवादन

Updated : 25 Jun 2020 8:57 PM GMT
Next Story
Share it
Top