Home > Max Woman Blog > स्त्रियांना पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास भाग पाडलेली मनुस्मृती पूर्णपणे जळाली का?

स्त्रियांना पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास भाग पाडलेली मनुस्मृती पूर्णपणे जळाली का?

#Manusmriti : देशात गेली शेकडो वर्षे जातीच्या नावाखील अन्याय आणि अत्याचार केले गेले. रुढी आणि परंपरांच्या नावाखाली दलित समाजाला मुख्य प्रवाहाता येऊ दिले गेले नाही, यासाठी मनुस्मृतीचा वापर केला गेला आणि दलित समाजावर अत्याचार सुरूच राहिले. पण या अन्याय्य रुढी-परंपरांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ. आंबेडकरांनी सुमारे ९४ वर्षांपूर्वी दहन केले. पण तरीही ही मनुस्मृती पूर्णपणे जळालेली आहे का, की अजूनही ती अनेकांच्या रक्तात आणि मनात आजही भिनलेली आहे. मनुस्मृतीने केवळ दलित समाजावर अन्याय केला असे नाही तर स्त्रियांनाही पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास मनुस्मृतीने भाग पाडले आहे. त्यामुळे मनुस्मृतीचे दहन होणे का गरजेचे आहे याचे विश्लेषण करणारा माधव खरे यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी लिहिल होता...जातीयवादी मानसिकतेचा बुरखा फाडणारा लेख नक्की वाचा...

स्त्रियांना पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास भाग पाडलेली मनुस्मृती पूर्णपणे जळाली का?
X

जाळून टाकावा मनुग्रंथ, असं महात्मा जोतिराव फुलेंनीही आधीच्या शतकात म्हटलं होतं. परंतु त्यांचे ते शब्द प्रत्यक्षात उतरायला आणखी काही वर्षे जावी लागली आणि २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंच्या त्या शब्दांना, भावनेला मूर्त स्वरूप दिलं. जी मनुस्मृती अस्पृश्यतेचं, वर्णभेदाचं, जातिव्यवस्थेचं, स्त्रीच्या गुलामगिरीचे समर्थन करतं त्या मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याकाठी जाहीर दहन केले.

२५ डिसेंबर १९२७ रोजी झालेला हा सर्व घटनाक्रम आपल्या सगळ्यांनाच माहीत असतो. शालेय शिक्षणापासून आपण तो वाचत आलेला असतो.

प्रश्न असा आहे कि बाबासाहेबांनी दहन केलेली मनुस्मृती पूर्णपणे जळाली का ? तर त्याचे प्रामाणिक उत्तर आहे- नाही!

शतकानुशतके इथल्या तथाकथित उच्चवर्णीयांच्या रक्तात भिनलेली मनुस्मृती नष्ट झालेलीच नाही. उलट मागील सहा वर्षात ती पुन्हा उफाळून वर येऊ लागली आहे.

यातील १२ अध्यायांमधील मार्गदर्शक (?) भाष्याचा अभ्यास केल्यावर आणि विवेकाने विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवते की त्यात आजच्या काळात घेण्यासारखे काहीही नाही. त्यात जे काही चांगले आहे असा दावा मनुस्मृतीचे समर्थक करताना दिसतात तेही आजच्या काळाशी सुसंगत होऊ शकत नाही. शाश्वत मानता येईल असं मनुस्मृतीत काहीही नाही. याउलट उच्च वर्णाचा अहंकार, शूद्रांविषयी किळस, स्त्रियांविषयी अवमानास्पद विवेचन मनुस्मृतीत अनेक अध्यायांमध्ये आढळतं. अपवादाने काही तुरळक चांगले वाटावेत असे विचार त्यात जरूर आहेत. पाहा..

- विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी. (२.२३९)

- जेथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात. परंतु जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.(३.५६)

- स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्‍याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.(९.३)

- (पायी चालताना अरुंद) रस्त्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्‌), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्‌), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना याच क्रमाने अग्रक्रम द्यावा. (२.१३८).

परंतु आपल्या याच विचारांना छेद देणारी अनेक भाष्य मनुस्मृतीत आहेत.त्यातील काही तर प्रचंड निषेधार्हच आहेत.उदाहरणार्थ..

-'शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरूण इत्यादी द्यावे.' (मनु. १०.१२५)

-'धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्रानेही माता-पिता इत्यादी पोष्यवर्गाचे संवर्धन व पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्याहून अधिक द्रव्याचा धनसंचय करू नये. कारण धनसंचय झाला असता शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो.' (मनु. १०.१२९)

-शूद्राने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे लिंगविच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंडक घालतो. हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राणदंड द्यावा, असा उपदेश तो करतो.

-ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने केलेल्या संभोगाबाबत- मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा - (मनु ८.३६६) त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो. याउलट, ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार (नाणी) दंड होई व त्याने तिच्याशी व्यभिचार केल्यास पाचशे (मनु ८.३७८) आणि ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे दंड होई (मनु ३.३८५)

- एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाई व त्याची जीभ छाटून टाकली जाई (मनु ८.२७०), पण एखाद्या क्षत्रियाने वा वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे १०० व १५० दंड होई (मनु ८.२६७) आणि एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त १२ दंड होई (मनु ८.२६८) किंवा काहीच होत नसे.

- कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही.विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने करावे, अर्थात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही.

- ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.

- पहिल्या ऋतूप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा. जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा.

- जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा.

- पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे.

- जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेपर्यंत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय ९ मध्ये नमूद आहे.

आता हे वाचल्यावर तुम्ही काय म्हणाल? सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या कोणत्या माणसाला हे पटू शकेल? मात्र तरीही अनेकांना मनुस्मृती प्रेमाचे उमाळे येत राहतात आणि त्यात अनेक उच्चवर्णीय स्त्रियाही असतात हे आणखी विशेष!

[3:31 PM, 12/25/2021] Anita Mam Max Maharashtra: #Manusmriti : देशात गेली शेकडो वर्षे जातीच्या नावाखील अन्याय आणि अत्याचार केले गेले. रुढी आणि परंपरांच्या नावाखाली दलित समाजाला मुख्य प्रवाहाता येऊ दिले गेले आहे, यासाठी मनुस्मृतीचा वापर केला गेला आणि दलित समाजावर अत्याचार सुरूच राहिले. पण या अन्याय्य रुढी-परंपरांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ. आंबेडकरांनी सुमारे ९४ वर्षांपूर्वी दहन केले. पण तरीही ही मनुस्मृती पूर्णपणे जळालेली आहे का, की अजूनही ती अनेकांच्या रक्तात आणि मनात आजही भिनलेली आहे. मनुस्मृतीने केवळ दलित समाजावर अन्याय केला असे नाही तर स्त्रियांनाही पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास मनुस्मृतीने भाग पाडले आहे. त्यामुळे मनुस्मृतीचे दहन होणे का गरजेचे आहे याचे विश्लेषण करणारा माधव खरे यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी लिहिल होता...जातीयवादी मानसिकतेचा बुरखा फाडणारा लेख नक्की वाचा...

Updated : 25 Dec 2021 10:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top