Home > Max Woman Blog > "पालक बनणं" निसर्गदत्त असलं तरी, पालकत्व महत्वाचं आणि जबाबदारीचं काम

"पालक बनणं" निसर्गदत्त असलं तरी, पालकत्व महत्वाचं आणि जबाबदारीचं काम

पालक बनणं निसर्गदत्त असलं तरी, पालकत्व महत्वाचं आणि जबाबदारीचं काम
X

ही सुंदर पाककृती माझ्या लहान बहिणीनं तयार केलेली आहे. खास तिच्या मुलांसाठी. ती नेहमीच त्यांच्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग करते. आणि तिचे मुलं यामुळेच कुठलीही कुरबूर न करता सगळं अन्न आनंदाने जेवतात. तिच्यासारखेच मुलांनीही तिच्याकडून हे कलागुण संपादन केलेले आहेत. हे विशेष.

तीने पाठवलेली ही कौतुकास्पद कलाकृती पाहून मला आमचं बालपण आठवलं. आमचे वडील असेच आमच्यासाठी काहींनाकाही खास प्रयोग करत राहायचे. फार कौशल्य होतं त्यांचेकडे.. आमच्यासोबत सोबतच इतरही लहान मुलांची त्यांना प्रचंड आवड होती.


आपली लेकरं, त्यांचं संगोपन सर्वस्वी आपली जबाबदारी असते. जरी जन्माला आलेलं प्रत्येक मूल एक वेगळं व्यक्तिमत्व घडणार असतं, वेगळं वाढणार असतं. तरीसुद्धा त्यांची जडणघडण आपल्याशीच संबंधित असते. नाही का!

बहिणीला दोन मुलं आहेत. एक अकरा वर्षांचा तर छुटकू तीन वर्षांचा. तिची मुलं अगदी टापटीप असतात. कपड्यांच्या उत्तम घड्या करतात. मोठा मुलगा आपल्या स्वतःच्या शर्टाला उत्तम काचबटना करू शकतो. घरच्या प्रत्येक कामात तीला मदत असते. स्वयंपाकापासून कपडे मशीनमध्ये लावणे. भांडे पुसून लावणे. जी जी त्यांच्या आवाक्यात आहे ती ती सगळीच कामे.

आपली कामं आपण स्वतः करणे, ह्या सर्व सवयी आम्हां तीनही बहिणींच्या मुलांना आपोआप पडल्यात. हात धरून शिकवावं लागलं नाही. आम्ही मुद्दाम शिकवलंही नाही. यामागे आमचे आईवडील होते. अर्थातच त्यांच्यामागे त्यांचे आईवडीलही होते. म्हणजे आमचे आजीआजोबा.

म्हणजेच सवयी आणि संस्कार पिढ्यानंपिढया येत राहतात.

विशेष म्हणजे, आम्ही कधीही आमच्या घरात.. ही मुलांची कामे, ही मुलींची कामे असं वर्गीकरण लेकरांसमोर कधीही केलं नाही.

माझे वडील, माझे सर्व काका,. माझे सगळे भाऊ, त्यांची मुलं, माझा नवरा, माझा मुलगा घरातील सगळी कामे बिनदिक्कत करू शकतात. अगदी सुग्रास जेवणापासून. ही फार जमेची बाजू आहे. आणि अर्थातच समाधानाचीही.

आता हे कौतुक नाहीये. सांगायचा मूळ मुद्दा हा आहे की, बालपण हे अनुकरणीय असतं. त्यांच्या पुढ्यात जे काही असतं, ते तुमच्या नकळत ते आपोआप अगदी सहज स्विकारत असतात. सवयी असोत वा संस्कार.

आम्ही बऱ्याच पालकांना बघतो... बरेचदा शांततेने समजावून सांगण्याचा प्रयत्नही करतो. सांगायचा मुद्दा हा असतो, की तुम्ही टाईमपास करणार तर आपोआप मुलंही टाईमपास करणेच शिकणार आहेत.

मुलं बिघडतात, तेव्हा पालक फार त्रागा करतात. आणि आपल्याच लेकराला नको नको ते दुषणं लावून बसतात.

जेणेकरून मुलांच्या मनातदेखील तुमच्याबद्दल एक अढी निर्माण होते. तुमच्याबद्दल चीड निर्माण होते. एकवेळ अशी येते, की ते तुम्हांला चारचौघात बोलायलाही मागेपुढे पहात नाहीत. ह्याला सर्वस्वी कारणीभूत आपण स्वतः आहोत, हे मात्र तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, अथवा आपण ते मुद्दाम स्विकारत नाही.

आपण बाहेर कितीही चांगलं असण्याचा आव आणला तरीसुद्धा मुलं मात्र आपलं मूळ अंगीकारत असतात. बऱ्याच पालकांचा डायलॉग असतो, "काय माहिती कुठून शिकून आलंय..." ही निव्वळ पळवाट असते.

यावर हसण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण आपलं उठणं बसणं बोलणं चालणं इथपासून तर, तुमच्यातील सुप्त स्वभावगुण देखील ते सहज आत्मसात करीत असतात.

तुमची इतरांशी असलेली सामाजिक बांधिलकी, व्यावहारिक संबंध, चतुराई, आपुलकी, निष्ठा, प्रामाणिकपणा, स्वार्थीपणा हेही गुण ओघाओघाने आलेच.. ह्यात काहीच शंका नाही.

असो, माझी लहानी बहिणही जराशी आततायी स्वभावाची.. एकदा तीला सूचक म्हटलं, "तुझी लेकरं तुझ्याकडून तुझे सगळे कलागुण आणि गुणही अगदी तंतोतंत घेत आहेत..."

बहुतेक ती समजलीये. मुलांना फार चौकसतेने सांभाळते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वेळेला यादगार आणि सुंदर बनवते.

वेळ फार महत्वाची असते.

वेळेतच समजायला हवं असतं सगळं.

"पालक बनणं" निसर्गदत्त असलं तरीही, एकदा पालक बनलोत तर पालकत्व हेच आयुष्यातील सगळयांत महत्वाचं आणि जबाबदारीचं काम असतं.

असो, माझी बहीण मुलांसाठी अशी वेगवेगळी कौशल्य वापरते. याचं मला फार कौतुक वाटतं.

विशेष सांगायचं तर, आम्हां तीनही बहिणींचे मुलं शालेय अभ्यासक्रमात 'ढ' आहेत.. होते. असं असूनही ते 'जिनिअस' आणि 'माणूस' या सदरात मोडतात. याचं कारण हेच असावं.. जे फोटोत दिसतंय. आमच्या मुलांसाठी आमच्याकडे भरपूर वेळ होता, आहे आणि राहिल. सर्वांगीण विकास महत्वाचा.

शेवटी "पेराल तेच उगवेल"...🌿😊

आता ज्याला जिथून जे वेचायचं असतं तो बरोबर वेचतो.

- नमिताप्रशांत 🌿

Updated : 26 Jun 2025 7:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top