‘एकवेळ माझा गळा चिरा पण..’,आंदोलनकर्त्यांना ममता बॅनर्जींचं भावनिक आवाहन

Update: 2020-05-24 14:40 GMT

कोरोनाच्या संकटात भर म्हणून पश्चिम बंगालला अम्फान चक्रीवादळाने (Cyclone Amphan) चांगलंच झोडपलं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांचं सरकारही अडचणीत सापडलंय. राज्य सरकारने तातडीने मदत करावी म्हणून कोलकाता आणि इतर शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली आहेत. यावर “एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा” असं भावनिक आवाहन ममता बॅनर्जी यांनी नागरिकांना केलंय.

हे ही वाचा...

अम्फान चक्रीवादाळामुळे पश्चिम बंगालमध्ये जवळपास 1 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. तर, ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांमध्ये वीज पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगाल सरकारने तातडीने सोयीसुविधा पुरवाव्यात यासाठी कोलकाता आणि विविध भागातील शेकडो नागरकांनी रस्त्यावर येत पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शनं केली.

यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “राज्य सरकार दिवस-रात्र संपूर्ण परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व सुरळीत होईल. कृपया शांतता राखा. या व्यक्तीरिक्त मी तुम्हाला एकच सांगेल की, एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा.”

दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील क्षतीग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. यानंतर मोदींनी पश्चिम बंगालला १ हजार कोटींची तात्काळ मदतीची घोषणा केली. तसंच या चक्रीवादळामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.