Home > पंकजा मुंडे पक्ष सोडणार का?

पंकजा मुंडे पक्ष सोडणार का?

पंकजा मुंडे पक्ष सोडणार का?
X

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पक्षात तसंच स्थानिक राजकारणातही कोंडी करण्यात येऊ लागली. बीडच्या राजकारणातही पंकजा मुंडेंचं महत्त्व फारसं वाढणार नाही. याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घेतली’, असा आरोप पंकजा मुंडे समर्थकांनी वारंवार समाजमाध्यमांवर केला आहे.

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकारणापलीकडची मैत्री असल्यामुळं धनंजय मुंडे यांना पंकजा विरोधात रसद पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच करण्यात आलं होतं.’ असा आरोपही पंकजा मुंडे समर्थकांनी वारंवार बोलून दाखवला आहे.

कथित चिक्की घोटाळ्यावेळी धनंजय मुंडे यांची भुमिका सुध्दा चर्चेत राहिली. अशा सर्व पार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांची सातत्याने होत असलेली कोंडी पाहता त्यांच्या पराभवानंतर निदान पक्षांतर्गत पुनर्वसन होईल अशी अपेक्षा पंकजा मुंडे समर्थकांना होती.

मात्र, निवडणूकीनंतर विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांसाठी सुध्दा पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार झाला नाही. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत. त्यातही पंकजा मुंडे यांचा नंबर लागणार नाहीय. पक्षांतर्गत महत्त्वाची जबाबदारी त्यांना देण्यात येईल असं समर्थकांना वाटत होतं.

खुद्द पंकजा मुंडे यांनाही या संदर्भात आशा होती की, पक्षाची मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकेल. मात्र, प्राप्त परिस्थितीमध्ये जी पुर्नरचना पक्षांतर्गत करण्यात आली. त्यामध्ये सुध्दा पंकजा मुंडे यांना कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही.

या सर्व पार्श्वभुमीवर पक्षामध्ये राहून ही कुंचबना सहन करायची की, संघर्ष करायचा? या द्विधा मनस्थित पंकजा मुंडे सध्या आहेत.

पक्षश्रेष्ठीसुध्दा पंकजा मुंडे यांच्या नाराजीला कुठलाही भाव देताना दिसत नाहीत. सध्या राज्यात ‘सबकुछ देवेंद्र फडणवीस’ असंच भारतीय जनता पक्षात सुरु आहे.

फडणवीस सांगतील तिच पूर्व दिशा, तशा पध्दतीचेच निर्णय सध्या पक्षामध्ये होत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच सर्व प्रकारची तिकीटं देण्यापासून ते तिकीटं कापण्यापर्यंत निर्णय घेत आहेत. मात्र, त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देणारा एकही नेता सध्या पक्षामध्ये नाही.

एकनाथ खडसे शांत आहेत. त्यांना त्या पध्दतीने शांत करण्यात आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचंही तिकीट कापलं होतं. त्यांनाही शांत करण्यात आलं. ते ही संघर्षाच्या भुमीकेत नाहीत. विनोद तावडेही शांत आहेत. त्यांना सुध्दा पक्षाने कुठल्याही संघर्षासाठी वावच ठेवलेला नाही. त्यामुळं जी लोक घरी बसवण्यात आलेली आहेत. त्यांनी आता संघर्ष न करण्याचं ठरवलेलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वर केंद्रातील नेत्यांचं पाठबळ असल्यानं पक्षांतर्गत विरोधकांनासुध्दा आता कुठलाही मार्ग राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंसारख्या लढवय्या नेत्या या फडणवीसांच्या वर्चस्वाला शरण जातात का? की, त्यांच्या विरुध्द संघर्ष करतात. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? ही चर्चा सुध्दा वारंवार होत असते. पुन्हा एकदा या चर्चेने आता डोकं वर काढलंय. कारण प्रितम मुंडेंना उपाध्यक्ष करुन घरामध्येच वाद लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं बोललं जातंय.

हे ही वाचा

आर आर आबांचा नातू

“माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार” – पंकजा मुंडे

माझा बच्चू मी देशाला वाहिलाय !

पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? या प्रश्नावर महाराष्ट्रातील नामवंत संपादक विचारवंतांचं काय मत आहे? पाहूयात...

यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की, “माध्यमांमध्ये या प्रकारच्या चर्चा रंगवल्या जातात. पंकजा मुंडे पक्ष वगैरे सोडतील असं मला वाटत नाही. जरी कालच्या कार्यकारिणीत त्य़ांना कुठल्याही प्रकारचं पद दिलेलं नसलं तरी अजुनही त्या कोअर कमीटीवर आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणं अजून बाकी आहे. कदाचीत राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना मोठं पद मिळण्याची शक्यता असु शकते. जेव्हा जेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले त्यावेळी पक्ष त्यांच्यामागे भक्कम उभा होता. त्यामुळे मीडियाने अशा प्रकारच्या चर्चा करु नये.” असं उपाध्याय यांनी सांगीतलं.

“पंकजा मुंडेंची फार मोठी कोंडी झालेली आहे. त्या एकुणच अशा पेचात सापडलेल्या आहेत की, यातून बाहेर कसं पडायचं? हे एवढं सोप्पं गणित नाहीय. साधी गोष्ट आहे पंकजा मुंडेंनी सुरुवातीला मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. अशा प्रकारचे मेसेज द्यायला सुरुवात केली होती. त्या आपल्या स्पर्धक आहेत. हे फडणवीसांना समजल्या नंतर फडणवीसांनी त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला.

एका टप्प्यात पंकजा मुंडेंनी फडणवीसांशी जुळवून घेतलं असं वाटत होतं पण प्रत्यक्षात मात्र, फडणवीसांनी त्यांना जे हवं होतं तेच केलं. राज्यात भाजपा आता सत्तेत नाही तर विरोधात आहे. त्याच वेळी पक्षावर आणि पक्ष संघटनेवर फडणवीसांचा वरचश्मा आहे. हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे आत्ताची कार्यकारिणी जर बघितली तर त्यात फडणवीसांचेच सगळे लोक या कार्यकारिणीत आहेत असं दिसतं.

यात पंकजा मुंडेंचं स्थान कुठंच नाहीय. यावर ‘पंकजा मुंडेंना केंद्रात पाठवायचं असं आम्ही ठरवत आहोत’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले पण, पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात मंत्री होत्या त्यांना केंद्रात पाठवायचं आणि प्रितम मुंडे ज्या केंद्रामध्येच आहेत.

लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांना मात्र, राज्याच्या कार्यकारिणीमधे घ्यायचं तेव्हा हा डाव लक्षात घेतला पाहिजे. पंकजा मुंडेंना केंद्रात स्थान मिळेलही पण जे त्यांचं वलय आहे. ते पुन्हा मिळेल की नाही. हे सांगता येत नाही. त्यांनी जर दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचं म्हटलं तर एखादा नवीन नेता आपल्या पक्षात येत असेल इतर नेते त्याला विरोध करत असतात. कारण पंकजा मुंडेंना घ्यायचं तर त्यांना आमदार करावं लागेल विधान परिषद द्यावी लागेल. त्यांना पुन्हा मंत्री करावं लागेल. असं खूप काही द्यावं लागेल. त्याबदल्यात पंकजा मुंडेंकडून काय मिळेल हा मोठा प्रश्न आहे.

कदाचीत त्यांनी इतर पक्षांची चाचपणी केली असावी. पण आता त्यांना इतर कोणताही पक्ष घ्यायला तयार नाहीय. आणि आहे त्या पक्षात जो अवमान होतोय तो सोसण्यापलिकडे पंकजा मुंडेंकडे पर्याय नाही.” असं मत दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी म्हटलं आहे.

“सद्य परिस्थितीत त्या असा कोणता निर्णय घेतील असं वाटत नाही. राज्यात तशी तशी राजकीय परिस्थिती देखील नाही. ज्यातून पंकजा मुंडे स्वत:चा विस्तार करतील.

‘मी कोणतीही प्रतिक्रीया दिली तर ती मलाच अडचणीत आणते’ असं मागे त्या स्वत:च बोलल्या होत्या. त्यामुळं सध्या तरी पंकजा मुंडे असा कोणता निर्णय घेतील असं मला वाटत नाही” अशी प्रतिक्रीया साम टिव्हीचे संपादक निलेश खरे यांनी दिली आहे.

“पक्षाला जर तीची गरज असेल तर तिचं पुर्नवसन करतील पार्लमेन्टरी बोर्ड अथवा राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देवु शकतील. मुख्यमंत्री पदाचे जे जे दावेदार होते. त्यांना फडणवीसांनी जाणीवपुर्वक दूर केलं.

तावडे, खडसे, पंकजा मुंडे या सगळ्यांवर आरोप झाले. फडणवीस यांना केंद्रातून आशिर्वाद असल्याशिवाय हे झालं नाही. पंकजा या पक्ष सोडतील असं वाटत नाही. कारण जाणार कुठे त्यांना पक्षात राहूनच काम करावं लागेल.” असं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी म्हटलं आहे.

एकंदरींत पंकजा मुंढे यांची राजकारणात इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे.

Updated : 4 July 2020 7:30 PM GMT
Next Story
Share it
Top