Home > निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख

निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख

निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख
X

देशभरातील मजूरांना आपल्या राज्यात परतण्यासाठी केंद्र सरकार प्रवास खर्चाचा ८५% भार उचलत असल्य़ाचं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी केलं आहे. या वक्तव्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आश्चर्य व्यक्त करत निर्मला सीतारमण यांनी दिलेली माहिती खोटी आहे असं म्हटलंय. राज्यातील स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे.

हे ही वाचा...

“निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला. रेल्वेचे तिकीट केंद्रीय रेल्वे प्रशासन देत नाही. त्याचा सर्व भार राज्य सरकार उचलत आहे. यापूर्वी जे मजूर रेल्वेमार्फत गेले त्या सर्व श्रमिकांकडून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे पैसे घेतले. मजुरांजवळ काम नाही. त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे मजुरांचा प्रवास मोफत करा, अशी मागणी आम्ही त्याचवेळी केली होती. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाने आमचे ऐकले नाही.” अशी माहिती अनिल देशमुख यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. या मजुरांच्या तिकीटाचा 85% खर्च हा केंद्र सरकार उचलत आहे. तर 15% खर्च राज्य सरकार उचलत आहे असं म्हटलं होतं. यावर अनिल देशमुख यांनी आक्षेप घेत अर्थमंत्री सीतारमण जे सांगत आहे ते सध्याच्या वस्तुस्थितीला धरून नाही, असे स्पष्ट केले आहे.

त्यांनी म्हटलंय की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे. आणि भविष्यात अजून पैसे लागल्यास तेही दिले जातील.

“महाराष्ट्राला जवळपास ७०० ते ८०० ट्रेनची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातून आज जवळपास ५० ट्रेन जाणार आहेत. लोक तासनतास रांगेत उभं राहून आपल्या नावांची नोंद करत आहेत. आतापर्यंत २२४ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी २ लाख ९२ हजार स्थलांतरितांना आपापल्या राज्यात सोडण्यात आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

Updated : 18 May 2020 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top